श्री. हिं. ल. पवार हे महाराष्ट्र शासनाच्या प्रशासन, वित्त व लेखा क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेले अधिकारी, प्रशिक्षक आणि लेखक आहेत. सांगली जिल्ह्यात जन्मलेल्या श्री. पवार यांनी आपल्या शासकीय सेवेत विविध जबाबदाऱ्या सांभाळत प्रशासन व वित्तीय व्यवस्थेचा व्यापक अनुभव मिळविला.
शिक्षण
त्यांनी बी.ए. (शिवाजी विद्यापीठ), एल.एल.बी. (मुंबई विद्यापीठ) तसेच जी.डी.सी.ए. ही शैक्षणिक पात्रता संपादन केली आहे.
शासकीय सेवा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झाल्यानंतर त्यांनी मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून शासकीय सेवेला सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतच निवड होऊन महाराष्ट्र वित्त व लेखा संवर्गात विविध पदांवर काम केले.
प्रदीर्घ आणि अनुभवसमृद्ध शासकीय सेवेनंतर ते सहसंचालक, लेखा व कोषागारे या पदावरून सेवानिवृत्त झाले.
प्रशिक्षण व मार्गदर्शन क्षेत्रातील योगदान
सेवानिवृत्तीनंतरही त्यांचा प्रशासकीय अनुभव आणि प्रशिक्षणाचा प्रवास सुरूच आहे. विविध शासकीय प्रशिक्षण संस्थांमध्ये अभ्यागत व्याख्याता व प्रशिक्षक म्हणून त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले आहे.
त्यांनी खालील संस्थांमध्ये प्रशिक्षण व मार्गदर्शनाचे कार्य केले आहे—
– यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे (यशदा)
– महाराष्ट्र पोलीस अकॅडमी
– महाराष्ट्र वन विकास प्रबोधिनी, कुंडल
– म्हाडा, पुणे
– कृषी विभाग प्रशिक्षण संस्था (रामेती), पुणे, खोपोली व कोल्हापूर
– राज्य शिक्षण व संशोधन परिषद, पुणे
– प्रादेशिक अभियांत्रिक प्रशिक्षण संस्था, सांगवी
– लेखा व कोषागारे प्रशिक्षण संस्था, पुणे
– आदिवासी प्रशिक्षण संस्था, पुणे
प्रशासन, कार्यालयीन कार्यपद्धती, वित्त व लेखा, विभागीय चौकशी, खरेदी प्रक्रिया आणि शासकीय नियम या विषयांवरील त्यांचा प्रत्यक्ष अनुभव त्यांच्या लेखनातूनही प्रकर्षाने जाणवतो.
लेखन
श्री. पवार यांनी उपयोजित साहित्य तसेच ललित साहित्य अशा दोन्ही क्षेत्रांत लेखन केले आहे.
उपयोजित साहित्य
१. अधिकारी कर्मचारी मार्गदर्शक — दहावी आवृत्ती
२. वस्तुनिष्ठ प्रश्नसंच
३. विभागीय चौकशी प्रक्रिया
४. खरेदी प्रक्रिया — जेम पोर्टल व ई-टेंडर
शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजात मार्गदर्शक ठरावे, या उद्देशाने त्यांनी उपयोजित साहित्याची निर्मिती केली आहे.
ललित लेखन
१. गोष्ट अनुभवाची
२. गावाकडची माणसं
ललित लेखनातून त्यांनी आपल्या जीवनातील अनुभव, माणसं, आठवणी आणि ग्रामीण जीवनातील विविध पैलू शब्दबद्ध केले आहेत. त्यांच्या लेखनात अनुभवातून आलेली सहजता, माणसांकडे पाहण्याची संवेदनशील दृष्टी आणि साधी, ओघवती भाषा जाणवते.
पुरस्कार व सन्मान
१. साहित्य सेवा कार्य कृतज्ञता पुरस्कार — २०२५
परभना फाउंडेशन, पुणे
२. गगन भरारी या पुस्तकात यशोगाथा
वल्लरी मीडिया व समर्थ फाउंडेशन यांच्या वतीने प्रकाशित
३. गगन भरारी समर्थ पुरस्कार — २०२५

